सूर्यकांत आसबे/सोलापूर
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात सुमारे २५ लाखाहून अधिक भाविक दाखल झाले होते. यामुळे हरी नामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. दर्शन रांगेमध्ये भाविकांना २४ किलोमीटर अंतर पायपीट करावी लागली. दर्शनाला सुमारे ३० ते ३२ तास लागले. यंदाच्या वर्षी विक्रमी यात्रा भरली असल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने भाविकांना चांगल्या सुविधा दिल्या असल्यामुळे भाविकातून समाधान व्यक्त करण्यात आले
यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेत सुमारे ३० लाखांहून अधिक भाविक येणार असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. त्यानुसार गेल्या महिन्यापासून आषाढी यात्रेचे नियोजन करण्यात येत होते. पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कार्तिकयन यांच्या नियोजनाखाली आषाढी यात्रेची तयारी केली. आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात सुमारे ३० लाखापेक्षा अधिक भाविक दाखल झाले आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांग लावली विठ्ठलाची पददर्शन रांग सुमारे १२ किमी लांब गेली होती. यामुळे भाविकांना २४ किमी पायपीट करावी लागली. दर्शनाला सुमारे ३० तास कालावधी लागला. यंदा भाविकांना लवकर दर्शन मिळण्यासाठी व्हीआयपी दर्शन बंद केले होते. मात्र यंदाच्या वर्षी विक्रमी यात्रा भरली असल्यामुळे दर्शनासाठी विलंब लागला असल्याचे दिसून येत आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पददर्शन रांगेतील भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सुमारे दहा दर्शन मंडप उभा केले होते. यात भाविकांना पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, भोजन याची सुविधा केली.
पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक
यंदा यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये याची दक्षता घेण्यात आली होती. गेल्या वर्षी पेक्षा यंदाच्या यात्रेत दुप्पट तर काही ठिकाणी पाचपट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन सुविधेची पाहणी केली होती. यानंतर पंढरपुरात आल्यानंतरही त्यांना सुविधेची पाहणी दिसून आली. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कार्तिकने यांच्या कामाचे कौतुक केले.