मुंबई : विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची सन २०२७ च्या पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याकरिता सरकारने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना केली आहे. मात्र, या समितीत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ही समिती गठीत केली आहे. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२७ रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी व्यक्तींची नावे केंद्राकडे पाठविण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. ही समिती विविध माध्यमांतून प्राप्त प्रस्तावांची छाननी करून मान्यवरांच्या नावांची शिफारस राज्य सरकारला करेल.
या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. पद्म पुरस्कारासाठी सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही विचार होतो. असे असताना शेलार यांना समितीत स्थान देण्यात आलेले नाही.