जळगाव : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाट हा अवघड आणि धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून या घाटावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अपघात, वाहतूककोंडी आणि विलंबाचा सामना करावा लागत होता. आता या घाटावरून प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने ५.५० किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक बोगद्याच्या बांधकामास मंजुरी दिली आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सुमारे २,४३५ कोटी खर्च होणार असून, टेलवाडी ते बोधरे दरम्यान सुमारे १५ किलोमीटरच्या टप्प्यात हा बोगदा उभारला जाणार आहे. या बोगद्यामुळे संभाजीनगर-पुणे दरम्यानचा प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच अपघातांचे प्रमाण घटेल. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
औट्रम घाटात अनेक अपघात झाले, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. घाटाऐवजी सुरक्षित बोगदा उभारावा ही जनतेची मागणी होती. त्या अनुषंगाने वारंवार केंद्रीय पातळीवर वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा केला गेला. अखेर केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरेल. या प्रकल्पामुळे इंधन बचत, वेळेची बचत आणि अपघातांमध्ये घट होईल.
या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, माजी खासदार उन्मेष पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहेत.
बोगद्याची रचना
डबल ट्यूब स्ट्रक्चर, अत्याधुनिक वायुवीजन, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग अशी बोगद्याची रचना असून फायर सिस्टिम, डिजिटल सेन्सर, सीसीटीव्ही, वाहन नियंत्रण केंद्र अशी सुरक्षा सुविधा राहणार आहे. बोगद्यात वाहन वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत राहू शकेल.