मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत परीक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता दिल्याचे परिपत्रक आहे. असे लांगूलचालन चालणार नाही, अशी भूमिका घेत दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बुरखा घालून बसण्यावर बंदी घालावी, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. नितेश राणे म्हणाले की, हा निर्णय २०२४ सालचा आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये नेमके तेच विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत का?, हे देखील पाहावे लागेल. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये. विशिष्ट धर्माचे लांगुलचालन होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. बुरखा घालून परीक्षेला बसण्याचे इतरही अनेक धोके आहेत. त्याचा विचार करून बुरख्याची परवानगी देणारे परिपत्रक काढले असेल तर ते तत्काळ रद्द करा, असे राणे म्हणाले.