मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरे तर सोडा, आम्ही उद्धव ठाकरेंबरोबरही निवडणुका लढणार नाही, असे खळबळजनक विधान काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केल्याने ‘मविआ’मध्ये बिघाडी होण्याचे संकेत दिसत आहेत.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार असल्याचे थेट संकेतच दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येतात? याकडे अनेकाचं लक्ष लागलेलं आहे.
ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आम्ही राज ठाकरे तर सोडाच, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही निवडणूक लढवणार नाही. मी जेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हाही मी ही गोष्ट ‘डंके की चोट’ पर सांगितली होती’, असे विधान जगताप यांनी केलं आहे.
आताही काँग्रेसची जी बैठक झाली त्यात आमच्या जवळपास सर्वच नेत्यांनी हेच सांगितले. आमचे काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला हे देखील होते. आम्ही त्यांना सांगितलं ही एकतर या स्थानिक निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, या निवडणुका नेत्यांच्या नाहीत. कार्यकर्त्यांच्याही इच्छा असतात की आपणही कधी ना कधी निवडणूक लढवल्या पाहिजेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, तर त्यांना या निवडणुका लढू दिल्या पाहिजेत. त्यामुळे आम्हाला शिवसेनेबरोबरही गेलं नाही पाहिजे आणि राज ठाकरेंबरोबर जाण्याचा तर प्रश्नही नाही”, असे जगताप यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की, ‘आम्ही आमची मते मांडली आहेत. आतापर्यंत काँग्रेसने कधीही असे म्हटलेलं नाही की राज ठाकरे यांना बरोबर घेऊ आणि म्हणणारही नाही. मविआ हा उद्धव ठाकरे यांचा एक पक्ष नाही तर सर्व मिळून आघाडी आहे. जेव्हा महाविकास आघाडी तयार झाली होती तेव्हा उद्धव ठाकरे यांची एकच शिवसेना होती, पण आता दोन-दोन शिवसेना झालेल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय म्हणतात? किंवा त्यांना काय ठरवायचं हा त्यांना अधिकार आहे. पण काँग्रेस तसा काही निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रात आमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना या स्थानिक निवडणुकीत निर्णय घेऊ घेऊ दिला पाहिजे”, असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.