महाराष्ट्र

अशा नरभक्षक प्रवृत्तीला ठेचण्याचीच गरज! आईची निर्घृण हत्या करणाऱ्या कोल्हापूरच्या क्रूरकर्म्याची फाशी कायम; HC चे शिक्कामोर्तब

कोल्हापूरमध्ये २८ ऑक्टोबर २०१७ रोजी ही हत्येची घटना घडली होती. ‘अशा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्यातील आरोपीला माफी नाही. या नरभक्षक प्रवृत्तीला ठेचण्याचीच गरज आहे, असे स्पष्ट करत खंडपीठाने जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली.

Swapnil S

मुंबई : जन्मदात्या आईची निर्घृण हत्या करून तिचे काळीज व अन्य अवयव शिजवून खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम मुलाची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवली. हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे. अशा गुन्ह्यातील आरोपीला माफी नाही, तर या नरभक्षक प्रवृत्तीला ठेचण्याचीच गरज आहे, असे निरीक्षण नोंदवत आरोपी सुनील कुचकोरवीला कोल्हापूर सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर खंडपीठाने शिक्कामोर्तब केले.

नेमके प्रकरण काय?

कोल्हापूरमध्ये २८ ऑक्टोबर २०१७ रोजी ही हत्येची घटना घडली होती. आईने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, या रागातून सुनील कुचकोरवीला याने आईची निर्घृण हत्या केली. केवळ हत्या करण्यावर न थांबता सुनीलने आईचे काळीज व इतर अवयवांना चटणी, मीठ लावून ते अवयव स्टोव्हवर शिजवून खाण्याचा प्रयत्नही केला. रक्तबंबाळ अवस्थेतील आईच्या मृतदेहाशेजारी सुनील बसलेला असल्याचे शेजारच्या मुलाने पाहिले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या थरकाप उडवणाऱ्या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

याप्रकरणी आरोपी सुनील कुचकोरवीला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. महेश कृष्णाजी जाधव यांनी दोषी ठरवून जुलै २०२१ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, तर राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर दीर्घ सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला.

‘अशा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्यातील आरोपीला माफी नाही. या नरभक्षक प्रवृत्तीला ठेचण्याचीच गरज आहे, असे स्पष्ट करत खंडपीठाने जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली. यावेळी आरोपी सुनील कुचकोरवीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खंडपीठासमोर हजर करण्यात आले.

महापालिकेचे निवृत्त कर्मचारी रामा कुचकोरवी-माने यांचा सुनील हा मोठा मुलगा. वयोवृद्ध माता, पत्नी लक्ष्मी व चार मुलांसह माकडवाला वसाहतीत पत्र्याच्या शेडमध्ये सुनील राहत होता. तो दारू आणि इतर व्यसनांच्या अक्षरशः आहारी गेला होता. घटनेपूर्वी दोन दिवसांपासून तो नशेत तर्र होता. पत्नी व मुलांना त्याने अमानुष मारहाण केली होती. जीवे मारण्याची धमकी दिल्याने पत्नी लक्ष्मीने भीतीपोटी मुलांसह माहेर गाठले होते. २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराला सुनील घरी आला, वृद्ध आईने त्याला जेवण वाढले. पण जेवणाचे ताट भिरकावून सुनीलने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार देताच त्याने गळा दाबून आईचा अमानुष खून केला. जीवाच्या आकांताने तडफडणाऱ्या वृद्धेची हालचाल थंड होताच नराधम सुनीलने चाकू आणि सत्तुराने पोटावर, मांडीवर वार केले. शरीराच्या उजव्या बाजूचे अवयव काढून ते स्टोव्हवर शिजवून खाण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा न्यायालयात या खटल्यात ३४ साक्षीदारांपैकी प्रत्यक्षात १२ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यात तपास अधिकारी संजय मोरे, गुरुप्रसाद जाधव, मयुर कंदले, नवनाथ डवरी, फिर्यादी राजू कुचकोरवी, डॉ. नितीन जगताप, रफिक बागवान, तानाजी चौगुले, नथुराम गायकवाड, सहाय्यक निरीक्षक तृप्ती देशमुख, उपनिरीक्षक भाऊसाहेब मलगुडे, रक्षका कुचकोरवी, यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या होत्या.

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

मुंबई, उपनगरात ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; ५ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी आता ८ सप्टेंबरला

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार