मुंबई : महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे वेळेत प्रस्ताव पाठवला, त्यानंतरच केंद्राचे पाहणी पथक येऊन पाहणी करून गेले. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्यांच्या पायाभूत सुविधांची उभारणी व्हावी यासाठी सरकार कटीबद्ध आहे. म्हणूनच, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाठपुरावा करणारी दोन पत्रे केंद्राकडे पाठवली. दोन्ही प्रस्तावांच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून केंद्राला वेळेत प्रस्ताव आला आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी बुधवारी दिले.
एआयचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेसने व्हिडिओ केला. याबाबत बावनकुळे म्हणाले, त्यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून आपले जीवन सुरू केले. त्यांच्या जीवन संघर्षावर टीका करणे किंवा जुने व्हिडिओ व्हायरल करणे, ही काँग्रेसची पराभूत आणि घृणास्पद मानसिकता आहे. मोदींच्या चरित्रावर टीका करणे विरोधकांना नेहमीच अंगलट आले आहे. काँग्रेस हे बुडते जहाज असून २०२९ पर्यंत काँग्रेस नामशेष झालेली दिसेल. लोकं विसरत नाही. आणि लोकप्रिय पंतप्रधानाबाबत केलेली टीका जनता माफ सुद्धा करत नाही, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
पराभवाच्या भीतीतून ईव्हीएमवर संशय
सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी ईव्हीएम आणि स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबाबत केलेले आरोप बावनकुळे यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, सांगली किंवा इतर ठिकाणी ईव्हीएम सुरक्षित आहेत. विरोधकांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे. केवळ कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी ते निवडणूक आयोगावर आणि यंत्रणेवर बिनबुडाचे आरोप करत आहेत.
ती ‘फाईल’ गायब होणार नाही
मंत्रालयातून महात्मा फुले यांच्याशी संबंधित महत्वाची फाईल गहाळ झाल्याप्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल झाला आहे. ही फाईल ई-ऑफिसवर उपलब्ध असून ती पुन्हा जनरेट केली जाईल. मात्र, फाईल गहाळ होणे गंभीर असून, संबंधित जबाबदार अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.