मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनाची निर्णायक बैठक घेताना त्यांनी मराठा समाजाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. "फडणवीस यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. सलाईनमध्ये विष घालून मला मारण्याचा कट होता. मी सागर बंगल्यावर जातो. फडणवीस मला मारून दाखवा,"अशी जहरी टीका जरांगेंनी फडणवीसांवर केलीय. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करण्याचा निर्धार केलाय. जरांगेंच्या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आलीय. दरम्यान, माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी एका वाक्यातच प्रतिक्रिया दिलीय. "मी ऐकलं नाही. मी पाहिलं नाही, तर मी कशाला उत्तर देऊ," असं फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत काय म्हणाले?
"मी सागर बंगल्यावर येतो. फडणवीसांनी मला मारून दाखवावं. मला मारण्याचा हे प्रयत्न करत आहेत. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न झाला. फडणवीस मला ब्राह्मणी कावा दाखवत आहेत. पण हे फडणवीस काय चीज आहेत हे मला माहिती आहे. एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नाहीत. छगन भुजबळ, अजित पवार हे कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत. भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश का करत आहेत.
अशोक चव्हाण कधीही काँग्रेस सोडू शकत नाहीत. पण देवेंद्र फडणीसांच्या काव्यामुळे त्यांना पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी लागली. नारायण राणेंच्या माध्यमातून मला काहीही बोलायला सांगत आहेत. ५ महिने झाले तरी आंदोलकांवरील गुन्हे फडणवीस मागे घेत नाहीत. मी समाजासाठी काम करत असेल, तर काय चूक केलीय. मला मारायचा असेल तर लगेच मारून टाका. मी सागर बंगल्यावर येतो. मला काही झालं तर माझा मृतदेह त्यांच्या दारात नेऊन टाका. त्यांना माझा बळी घ्यायचा आहे."