महाराष्ट्र

अजितदादांच्या आमदारांसाठी दरवाजे खुले! पवार यांचे सूचक वक्तव्य

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली. त्यामुळे तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत आपले पानिपत होऊ शकते, अशी भीती राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदारांना आहे.

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकीत बाजी मारणाऱ्या मविआतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयार केली आहे. अजितदादा गटाच्या आमदारांना पुन्हा पक्षात घेणार नाही, असे वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे प्रमुख (शरदचंद्र पवार गट) शरद पवार यांनी अजितदादा गटांच्या काही आमदारांसाठी पक्षाचे दरवाजे किलकिले केले आहेत. अजितदादांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना प्रवेश बंदी नाही, असे सूतोवाच करून शरद पवार यांनी अजितदादांना धक्का देण्याचे ठरवल्याचे कळते.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली. त्यामुळे तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत आपले पानिपत होऊ शकते, अशी भीती राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदारांना आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी विधानसभा निवडणुकीत अजितदादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नसल्याचे स्पष्ट केले.

येत्या निवडणुकीत पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. पक्षाकडे अनेक चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ. अजित पवार गटातील आमदार आमच्यासोबत यायला इच्छुक आहेत. अनेक आमदारांनी शरद पवारांची भेटदेखील घेतली आहे.

पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीवाटप पूर्ण झाल्यानंतर येऊ, असे आश्वासन आमदारांनी दिल्याचे शरद पवारांनी सांगितले.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या जास्त होती. मात्र, शरद पवारांवर टीका करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे इतरांचा विचार केला जाईल, अशा प्रकारचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

अजितदादांना मोठा धक्का बसण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीतील निराशानजक कामगिरीनंतर टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवार यांना यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजितदादा गटातील आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नव्या जोमाने उतरण्याच्या तयारीत असलेल्या अजित पवार यांच्या मनसुब्यांना धक्का बसू शकतो.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे