महाराष्ट्र

महाराष्ट्रात गुंडाराज, राष्ट्रपती राजवट लागू करा; फडणवीसांना माणूस व कुत्र्यांमधील फरकही समजेना! : नाना पटोलेंचा हल्लाबोल

Swapnil S

ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत, गुडांना कसलीच भीती राहिलेली नाही. कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, जळगाव, यवतमाळमधील गोळीबाराच्या घटनानंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची हत्या अशा घटना वाढत आहेत ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला तसेच मंत्रालयात गुडांचा वावर बिनदक्कितपणे सुरु आहे. तडीपार गुडांना राजाश्रय, पोलीस दलामधील राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे पोलीसही हतबल आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून हे ‘गुंडाराज’ बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी पटोले यांनी केली.

फडणवीसांना काहीच गांभीर्य नाही

घोसाळकरांच्या हत्येनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सवाल उपस्थित करून राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा मागणी विरोधक करत आहेत. त्यावर बोलताना "आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की एखाद्या गाडीखाली जर श्वान आले तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील", असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी म्हणाले होते. त्यावरूनही पटोले यांनी फडणवीसांचा समाचार घेतला. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असतानाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याचे काहीच गांभीर्य नाही. “गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील” असे बेजबाबदार वक्तव्य करुन त्यांनी आपल्या लाचारी व हतबलतेचे दर्शनच घडवले आहे. फडणवीस यांना माणूस व कुत्रा याच्यातील फरकही कळत नाही का? असे पटोले म्हणाले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस