छत्रपती संभाजीनगर : "विद्यार्थी हे दहशतवादी नसून या देशाचे भविष्य आहेत, सरकारने योग्य वर्तन केले नाही, तर देशातील तरुण हे सरकार बदलून दाखवतील, असा इशाराही कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी बुधवारी दिला.
दिल्लीतील महिनाभर चाललेल्या तीव्र आंदोलनानंतर अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले. तेथे ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारने विद्यार्थ्यांना त्रास देणे थांबवावे असेही ते म्हणाले.
अनेक राज्यांत पोलीस विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना अटकेच्या धमक्या देत आहेत, असे नमूद करून ते म्हणाले की, उद्या सरकार सुधारले नाही तर आम्ही सरकार बदलू, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. विमानतळावरून निघाल्यानंतर दीपके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ते वाळूज एमआयडीसी भागातील आपल्या निवासस्थानी रवाना झाले.
'पंतप्रधान मोदींनी इन्फ्लुएन्सर बनावे'
एका प्रश्नाला उत्तर देताना दीपके म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देऊन इन्फ्लुएंसर बनावे, कारण ते काम ते खूप उत्तम प्रकारे करू शकतात. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे विद्यार्थ्यांचा राग शांत झाला आहे असा भ्रम सरकारने बाळगू नये, असे सांगत गरज पडल्यास याहून मोठ्या प्रमाणावर पुन्हा नवीन आंदोलन पुकारले जाईल, असेही दीपके यांनी स्पष्ट केले