मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधी द्वेषाची काविळ झाली असून मोघलांना जसे धनाजी संताजी दिसत होते, तसे भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना दिवसरात्र राहुल गांधीच दिसत आहेत, त्याच भितीपोटी ते दररोज राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात. खरे लायर तर दिल्लीत बसले असून महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर बसले आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकर चव्हाण, आ. अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजीत कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खासदार कल्याण काळे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, आ. राजेश राठोड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष युसुफ शेख आदी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले असतानाही अजून या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. अद्याप आरक्षणही जाहीर झालेले नाही. परंतु काँग्रेस पक्षाने या निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. आघाडीचा निर्णयावर राज्य पातळीवर चर्चा झालेली नसून स्थानिक पातळीवरच मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, संघटनात्मक बांधणीवरयावेळी विचार विनिमय करण्यात आला. काँग्रेस पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांचा असून मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला आजही मोठे जनसमर्थन आहे. मस्साजोग ते बीड पदयात्रा, परभणीतील संविधान बचाव यात्रा, परळीतील सद्भावना सत्याग्रह तसेच नांदेडमध्ये झालेली शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली यातून काँग्रेस पक्षात आजही जोश व उत्साह कायम आहे हे दिसून आलेले आहे. काही नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ता मात्र काँग्रेस पक्षासोबतच आहे हे स्पष्ट झालेआहे.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने केलेले घोटाळे राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केले आहेत. देशातील लोकशाही धोक्यात असून ती वाचवण्याची गरज आहे आणि राहुल गांधी हे त्यासाठी लढत आहेत, या लढाईत देशातील सर्व विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे आहेत. राज्य सरकारमध्येही तिघांत वाद सुरू आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत नाहीत. केंद्र व राज्य सरकारचा हा गैरकारभार जनतेपर्यंत पोहचवला पाहिजे.
राज्यघटना व लोकशाही कशी धोक्यात आली आहे हे जनतेला सांगितले पाहिजे. पक्षातून जे गेले त्यांना जाऊ द्या, नवीन पालवी फुटली पाहिजे, काम करा पुन्हा काँग्रेसचे दिवस येणार आहेत असे थोरात म्हणाले. माजी मंत्री अमित देशमुखयावळा म्हणाल का, लाकसभताल विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशात नारा दिला आहे, 'वोट चोर, गद्दी छोड', त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस रस्त्यावर उतरेल हा संकल्प आज करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती सरकारच्या कामाचा पर्दाफाश करण्याचा निश्चयही करण्यात आला आहे.
अत्याचारी महायुती सरकारला या निवडणुकीत धडा शिकवला पाहिजेयावरही चर्चा झाली. महायुती सरकारने मराठवाड्याला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती अजून झालेली नसून मराठवाड्याचे मागासलेपण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. देशात व राज्यात लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या सरकारला वेळीच धडा शिकवला पाहिजे. आगामी काळात महाराष्ट्रात काँग्रेसचा तिरंगा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही देशमुख म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे...
मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. राज्यात मराठा समाजाला काँग्रेस आघाडीच्या सरकारने आरक्षण दिले होते. जातनिहाय जनगणना करावी हा काँग्रेस पक्षाचा आग्रह आहे, काँग्रेस पक्षाचे सरकार असलेल्या तेलंगणा व कर्नाटकात जातनिहाय जनगणना केलेली आहे आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी ही भूमिका आहे असे सपकाळ म्हणाले..
अजित पवारांचा राजीनामा घ्या
राज्यात दारु दुकानांच्या परवान्यांवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या मुलाचा दारुच्या व्यवसायाशी संबंध आहे. उत्पादन शुल्क विभाग अजित पवार यांच्याकडे आहे, यात उघडपणे conflict of interest दिसत असून मंत्रीपदाचा दुरुपयोग केलेला आहे. या प्रकरणी अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा असे सपकाळ म्हणाले.