मुंबई : मुंबईसह कोकणात सोमवारी पुन्हा एकदा वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सकाळी पावसाने मुसळधार बॅटिंग केली. अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळत असल्यामुळे दृश्यमानता कमी होऊन वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे गणपतीसाठी रस्तेमार्गे मुंबईहून कोकणात गावी निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मंगळवारपासून पावसाचा जोर आणखीन वाढणार असल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात पाऊस चांगलाच झोडपून काढणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दक्षिण कोकण, उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये मंगळवार आणि बुधवारी ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. दुपारनंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवाही पावसामुळे विस्कळीत झाली. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण-सीएसएमटी लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. पश्चिम रेल्वेलाही पावसाचा फटका बसला.
पावसाचा जोर वाढणार
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा राज्यावर पावसाचे संकट येऊन कोसळले आहे. २६ ऑगस्टपासून पावसाचा जोर आणखी वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, गोव्यामध्ये ३० ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात राज्यालाही या पावसाचा फटका बसू शकतो.