महाराष्ट्र

आढळरावांच्या प्रवेशाचे चंद्रकांत पाटील यांच्याकडून समर्थन

शिरूर लोकसभेत अजित पवारांनी शिवाजी आढळरावांना उमेदवारी दिली. त्यानंतर केवळ राष्ट्रवादीत नव्हे तर भाजपमध्ये ही खदखद निर्माण झाली आहे. हीच खदखद दूर करण्यासाठी महायुतीची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंतांच्या उपस्थितीत पार पडली.

Swapnil S

पुणे : कुटुंबातील एका मुलाने कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं तर काही दिवस खदखद असते, पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते, असं उदाहरण देत शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळरावांच्या प्रवेशाने निर्माण झालेल्या खदखदीवर चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं.

शिरूर लोकसभेत अजित पवारांनी शिवाजी आढळरावांना उमेदवारी दिली. त्यानंतर केवळ राष्ट्रवादीत नव्हे तर भाजपमध्ये ही खदखद निर्माण झाली आहे. हीच खदखद दूर करण्यासाठी महायुतीची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंतांच्या उपस्थितीत पार पडली. त्याचनुषंगाने दोन्ही नेत्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता महायुतीत खदखद असल्याची कबुली दोघांनीही दिली. भाजपमधील नाराज पदाधिकाऱ्यांना चंद्रकांतदादांच्या उपस्थितीने संकेत मिळालेले आहेत. त्यामुळं महायुती पुढच्या टप्प्यात जोमाने प्रचार करतील, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.

पाटील म्हणाले, अजूनही चाळीस दिवस आहेत. या छोट्या-छोट्या चुका सुधारल्या जातील. घटना घडली की त्यात सुधारणा करत जाऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक कुटुंबातील रक्ताच्या नात्यात ही कुरघोडी सुरूच असते. त्यामुळं हे वाद संपविण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुखाची असते. इथं तर वेगवेगळ्या पक्षातून आलेले कार्यकर्ते-पदाधिकारी आहेत. त्यांची ध्येय-धोरणं आहेत, त्यामुळं तेवढं चालायचं, म्हणत चंद्रकांत पाटलांनी अनेक मुद्यांवर सारवासारव केली.

नाराजीनाट्य होऊ नये म्हणून बैठका: उदय सामंत

शिरूर लोकसभेसंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले की, शिरूर लोकसभेत महायुतीत कोणतेही नाराजीनाट्य होऊ नये, म्हणून आज तीन प्रमुख पक्षांसह घटक पक्षांची बैठक झाली. समन्वय साधण्याचाचं हा प्रयत्न होता, आता यापुढे फक्त प्रचार सुरू राहील. त्यासोबतच शिवाजी आढळरावांचा पहिल्या टप्प्यातील प्रचार सुरू आहे. आजच्या बैठकीनंतर महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने प्रचारात उतरतील. सगळे एकदिलाने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे'

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले