औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून भाजपकडून ‘जल आक्रोश’ मोर्चा काढण्यात आला होता. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड सहभागी झाले होते. औरंगाबादमधील जल आक्रोश मोर्चासाठी तीन हजार हंडे, तर आठ हजार झेंडे घेऊन भाजप कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
हा भाजपचा मोर्चा नसून औरंगाबाद जनतेचा आक्रोश आहे. जोपर्यंत औरंगाबादच्या जनतेला पाणी मिळणार नाही, तोपर्यंत भाजप शांत बसणार नसल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच शिवसेनेने केवळ भावनेचे राजकारण केले; पण थेंबभर पाणी औरंगाबादला देऊ शकले नसल्याची टीका फडणवीसांनी केली. याच मार्गावर आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वखाली मोर्चा काढला आणि सत्ता बदलली होती. आता त्याच मार्गावर आम्ही चाललो आहोत. सत्ताबदल जेव्हा करायचा तेव्हा करूच; पण व्यवस्थेबद्दल हा मोर्चा असल्याचे फडणवीस म्हणाले.