संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

...अखेर जंजिरा किल्ला पुन्हा खुला; आठवडाभराच्या बंदीनंतर हवामान पूर्ववत

सतत पडणाऱ्या खराब पावसामुळे आणि हवामानामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेला ऐतिहासिक जंजिरा किल्ला आता पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्या आठवडाभर किल्ला बंद असल्याने निराश परतावे लागलेल्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Swapnil S

मुरूड-जंजिरा : सतत पडणाऱ्या खराब पावसामुळे आणि हवामानामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेला ऐतिहासिक जंजिरा किल्ला आता पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्या आठवडाभर किल्ला बंद असल्याने निराश परतावे लागलेल्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

४ नोव्हेंबरपासून हवामान पूर्ववत झाल्याने जंजिरा किल्ल्यावर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. पावसाळ्यात म्हणजे १ जून ते ३१ ऑगस्ट या काळात समुद्र खवळलेला असल्याने पुरातत्त्व विभागाकडून जंजिरा किल्ल्यावरची प्रवासी वाहतूक बंद ठेवली जाते. यंदा मात्र पावसाळा लांबल्याने ही बंदी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत कायम ठेवावी लागली. या काळात जंजिरा जलवाहतूक संस्थेतील कर्मचारी व बोटमालकांवर आर्थिक संकट ओढवले, कारण पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली होती. आता मात्र हवामान अनुकूल झाल्याने राजपुरी बंदर, दिघी बंदर आणि खोराबंदर येथून पुन्हा बोटींची वाहतूक सुरू झाली असून पर्यटकांना जंजिरा दर्शन घेता येत आहे.

दरवर्षी सुमारे सात लाख पर्यटक जंजिरा किल्ल्याला भेट देतात. सध्या दिवाळीनंतरचा काळ असल्याने समुद्रकिनारी चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरमई, पापलेट, हलवा, रावस, शेवंड आणि कोळंबी या ताज्या मासळीच्या स्वादासोबतच जंजिरा आणि पदमदुर्ग किल्ले, गोड माडी आणि निसर्गरम्य समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. आता ऊन पडू लागल्याने आणि ढगाळ वातावरण नाहीसे झाल्याने पर्यटन व्यवसायाला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान किल्ला बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे दूरदूरहून आलेल्या पर्यटकांची घोर निराशा झाली. आता मात्र हवामान स्वच्छ आहे आणि समुद्र शांत झाला आहे. त्यामुळे जंजिरा पाहण्यासाठी पर्यटकांनी नक्की यावे.
नाज मुददीन कादिरी, सचिव जंजिरा जलवाहतूक संस्था

Mumbai : मूर्ती कोसळून २ ठार; भुलेश्वरमध्ये गणेश आगमन सोहळ्यातील दुर्घटना

पवारांची तिरकी चाल! मित्रपक्ष घायाळ!

आजचे राशिभविष्य, २४ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सतत बसून काम केल्याने कंबरदुखीचा त्रास? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

Shravan Special : बाजारातील मिठाई नको, फुटाण्यांपासून घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पेढे; रेसिपी अगदी सोपी