मुंबई : कोकण भागातून मालवाहतुकीला गती देण्यासाठी आणि लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी कोकण रेल्वेने रत्नागिरी ते जवाहरलाल नेहरू पोर्ट म्हणजेच जेएनपीटी दरम्यान पहिली समर्पित कंटेनर ट्रेन सेवा जुलै २०२६ च्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
रत्नागिरी येथे ३ जून रोजी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे आयोजित व्यापारी परिषदेत यासंदर्भातील पथदर्शी आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय वखार महामंडळाचे प्रतिनिधी, मालवाहतूकदार आणि जयगड व आंग्रे बंदरांचे अधिकारी उपस्थित होते.
स्पर्धात्मक दराचे आश्वासन
या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी रत्नागिरी ते भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जेएनपीटी दरम्यान कंटेनर वाहतुकीच्या वाढत्या क्षमतेवर प्रकाश टाकला. ही प्रस्तावित सेवा व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरवण्यासाठी केंद्रीय वखार महामंडळाने मालवाहतूकदार आणि व्यापाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धात्मक दरांची ऑफर देण्याचे आश्वासन भागधारकांना दिले.
या परिषदेत खते आणि अन्नधान्य यांसारख्या प्रमुख वस्तूंच्या वाहतुकीत गुंतलेल्या व्यावसायिकांनी मोठा सहभाग नोंदवला होता. अंतर्गत भागातून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मालवाहतूक सुलभ करण्यासाठी जयगड बंदर आणि आंग्रे बंदराच्या प्रतिनिधींनी रेल्वे व बंदर यांच्यात अधिक चांगल्या समन्वयाच्या संधींवर चर्चा केली.
कोकण रेल्वेने अलीकडेच अद्ययावत केलेल्या मालवाहतूक पायाभूत सुविधांचे सादरीकरण केले आणि माल हाताळणी क्षमता सुधारण्यासाठी आगामी मालवाहतूक टर्मिनल्सच्या योजनांची माहिती दिली. ही नवीन सुविधा या भागातील उद्योगांसाठी अधिक जलद, विश्वासार्ह आणि किफायतशीर लॉजिस्टिक उपाय प्रदान करेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.