लातूर : नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयने स्थानिक पातळीवरील तीन बड्या व्यक्तींना अटक केल्यानंतर लातूरमधील कोचिंग क्लासचे जाळे चौकशीच्या फेऱ्यात आले आहे. मात्र, यंदा लातूरमध्ये क्लास प्रवेशांमध्ये झालेली मोठी घट ही सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळेच अधिक झाली असल्याचे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
लातूर शहरात ३०० हून अधिक वसतिगृहे आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले अनेक व्यवसाय आहेत. शहरात १२ वीच्या परीक्षेसाठी ७० ते ८० हजार विद्यार्थी बाहेरून आलेले आहेत.
‘नीट’ पेपर लीक प्रकरणाच्या संदर्भात सीबीआयने शहरातील ‘आरसीसी'चे संस्थापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर, सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली होती.
व्यापारी, हॉस्टेल चालक आणि कोचिंग क्लासच्या प्रतिनिधींच्या मते, हे क्षेत्र आधीच अनेक आव्हानांना तोंड देत होते, त्यातच चालू शैक्षणिक वर्षात परिस्थिती अधिकच खालावली आहे.
भागधारकांच्या मते, सर्वात मोठी चिंता जिल्हा उद्योग केंद्राच्या एका नवीन आदेशामुळे निर्माण झाली आहे. लातूर इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये उत्पादनासाठी दिलेल्या औद्योगिक शेडमध्ये बेकायदेशीरपणे चालणाऱ्या सर्व व्यावसायिक कामे तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारने कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लागू केलेले बायोमेट्रिक उपस्थितीचे बंधनकारक धोरण यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याव्यतिरिक्त, लांबलेला मान्सून आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या भीतीमुळेही पालकांच्या प्रवेश घेण्याच्या निर्णयावर विपरीत परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
लातूर हॉस्टेल असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पवार यांनी सांगितले की, सोशल मीडियावरून ‘लातूर पॅटर्न’ची बदनामी करणाऱ्या बातम्या आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक मशिन्स बसवण्याचा शासनाचा निर्णय, यामुळे चालू शैक्षणिक वर्षात १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशात ४० टक्क्यांची घट झाली आहे.
बँकेकडून कर्ज घेऊन अनेक हॉस्टेल्स आणि संबंधित संस्था उभारल्या गेल्या आहेत, तर काही भाड्याच्या जागेत सुरू आहेत. त्यामुळे या भीतीच्या वातावरणामुळे मालक सध्या आर्थिक तणावाखाली असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्य जिल्ह्यांना फायदा
लातूरबद्दल झालेल्या नकारात्मक प्रसिद्धीचा अप्रत्यक्ष फायदा इतर जिल्ह्यांतील कोचिंग सेंटर्सना झाला. पारंपरिकपणे लातूरला येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःकडे आकर्षित करण्याची नामी संधी त्यांना मिळाली, असे कदम यांनी स्पष्ट केले.