धनंजय कवठेकर/अलिबाग
नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अलिबागमध्ये शेकाप-काँग्रेस महाविकास आघाडीने जल्लोष साजरा केला. विकास आघाडीने थेट नगराध्यक्षपदासाठी अक्षया प्रशांत नाईक यांना निवडून आणले. रायगड जिल्ह्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून हा मान अक्षया नाईक यांना मिळाला आहे.
रायगड जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या २ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल तब्बल १९ दिवसानंतर जाहीर झाला, त्यामुळे चर्चा रंगली होती. सर्वांचे लक्ष रविवारी जाहीर होणाऱ्या निकालाकडे होते. अलिबागमध्ये माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, आघाडीने अपेक्षित यश मिळवून आपल्या करिश्म्याची पुनर्तप्ती केली. निवडणुकीपूर्वी प्रशांत नाईक बिनविरोध निवडले गेले होते, परंतु या वेळी त्यांचा वारस अक्षया नाईक यांनी नगराध्यक्ष म्हणून सत्ता स्वीकारली.
अलिबागमधून निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या शेकापच्या अक्षया प्रशांत नाईक या सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. अलिबाग नगरपालिकेत २० नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशी एकूण २१ जागांसाठी निवडणूक झाली. सुरुवातीपासूनच शेकाप-काँग्रेस आघाडीला विजयाची अपेक्षा होती. प्रत्यक्ष मतमोजणी नंतर आघाडीचे १७ उमेदवार विजयी ठरले.
स्वतंत्र रिंगणात उतरलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संदीप पालकर आणि सौ. श्वेता संदीप पालकर हे दोघे निवडून आले. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अंकित बंगेरा देखील विजयी ठरला. त्यामुळे नगरपालिकेत आता विरोधकांचा प्रवेश झाला आहे.
अक्षया प्रशांत नाईक झाल्या सर्वात तरुण नगराध्यक्ष
अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत अक्षया नाईक यांनी ऐतिहासिक विजय मिळवत राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेतले आहे. या विजयामुळे अलिबाग शहरात उत्साहाचे वातावरण असून, नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विजयानंतर अक्षया नाईक यांनी अलिबागकरांचे मनापासून आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या.प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अलिबागच्या जनतेने त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जो विश्वास दाखवला, तो कधीही विसरता येणार नाही. हा विजय केवळ माझा नसून, तो अलिबागच्या प्रत्येक मतदाराचा आणि कार्यकर्त्याचा आहे, असे त्यांनी नमूद केले. निवडणूक प्रचारादरम्यान मिळालेल्या प्रेम, पाठिंबा आणि सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.पुढील काळात अलिबागच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरपरिषदेमध्ये पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अलिबागच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.