मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राबविण्यात आलेल्या पदवी शिक्षणशास्त्र (बीएड) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. राज्यात ४८३ बीएड महाविद्यालयात एकूण ३६ हजार ६९८ जागांपैकी ३३ हजार ८७७ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. प्रवेशाची टक्केवारी ९२.३१ एवढी आहे. प्रवेशात सलग तिसऱ्या वर्षी मुलींची संख्या जास्त असून यावर्षी ७३.०७ टक्के मुलींनी प्रवेश घेतला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पदवी शिक्षणशास्त्र प्रवेशाला २५ जूनपासून सुरुवात झाली होती. ही प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. यात प्रवेशाच्या तीन फेऱ्या झाल्या असून संस्थात्मक फेरीसह चार फेऱ्यांत हे प्रवेश झाले आहेत. राज्यातील ४८३ पदवी शिक्षणशास्त्र महाविद्यालयांत हे प्रवेश झाले आहेत. मागील तीन वर्षांची आकडेवारी पाहिली असता पदवी शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. २०२३ -२४ मध्ये ८७.७३ टक्के, २०२४-२५ मध्ये ९०.७६ टक्के, तर २०२५-२६ मध्ये ९२.३१ टक्के प्रवेश झाले आहेत.
यावर्षी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ९५.५३ टक्के प्रवेश झाले आहेत. यात एकूण ३४ हजार १७० जागा कॅप अंतर्गत होत्या. त्यापैकी ३२ हजार ६४३ जागांवर प्रवेश झाले आहेत. ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये मात्र यावर्षी ४६.६७ टक्के प्रवेश झाले आहेत. म्हणजे ५३.३३ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. एकूण २,५२८ जागांपैकी १,१८० जागा भरल्या असून १,३८० जागा रिक्त राहिल्या आहेत.
पदवीनंतर शिक्षणशास्त्र (बीएड) क्षेत्रात करिअर करण्याकडे विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. यामध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. यावर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ९२ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यावर्षी प्रवेशाच्या चार फेऱ्या झाल्या व ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली.दिलीप सरदेसाई, आयुक्त, राज्य सीईटी कक्ष
सलग तिसऱ्या वर्षीही मुलींची संख्या जास्त
पदवी शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमात मागील तिन्ही वर्षी मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. २०२३ - २४ मध्ये ७४.३२ टक्के म्हणजे २२ हजार ३२७ , २०२४-२५ मध्ये ७४.७२ टक्के म्हणजे २४ हजार ७०४, तर २०२५-२६ मध्ये ७३.०७ टक्के म्हणजे २४ हजार ७५६ अशा चढत्या क्रमाने मुली शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमात प्रवेश घेत असल्याचे दिसते.