राज्यात उन्हाचा कडाका वाढणार; विदर्भात ४५° पारचा अंदाज, तर मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

राज्यात उन्हाचा कडाका वाढणार; विदर्भात ४५° पारचा अंदाज, तर मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा

देशात पुढील चार ते पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून, विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा पुन्हा चढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Swapnil S

पुणे : देशात पुढील चार ते पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून, विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा पुन्हा चढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आधीच ‘हॉट स्पॉट’ ठरलेल्या विदर्भात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी वर्धा येथे राज्यातील सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उष्णतेचा कडाका वाढत असतानाच राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत बुधवारी गारपीट झाली, तर दक्षिण कोकण, जळगाव, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतही पावसाची नोंद झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यात दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कायम राहणार आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या आसपास होते. मात्र बुधवारी दुपारनंतर अचानक आलेल्या पावसाने आणि गारपिटीने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. शिवाजीनगर, कोथरूड, डेक्कन, स्वारगेट आणि सिंहगड रस्ता परिसरात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली, तरी वातावरण काही काळासाठी सुखद झाले.

मुंबई-ठाण्यात दमट उकाडा वाढणार

कोकण किनारपट्टीवर, विशेषतः मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पुढील दोन ते तीन दिवस उष्ण व दमट हवामान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. उष्णतेसोबत वाढलेली आर्द्रता नागरिकांसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

'हवेतच २-३ मिनिटं विमान हेलकावलं'; थायलंडहून येणाऱ्या एअर इंडिया फ्लाइटमध्ये प्रवाशांचा थरकाप, Video

ड्रायव्हर नाही, भागीदार बना! महाराष्ट्रात सुरू होतंय 'नमो सहकार टॅक्सी' ॲप

माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Badlapur : बारवी ९० टक्के भरले; ठाणेकरांना मोठा दिलासा, एमआयडीसी प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश

'Gen Z काहीही करू शकतात!' पिवळी नाही केली जांभळी 'हळदी'; नवदांपत्याचा Video पाहून नेटकरी म्हणाले, 'थॅनोसचे नातेवाईक'