संगमनेर नगरपालिकेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मैथिली तांबे यांनी तब्बल १६ हजार मतांची भक्कम आघाडी घेतली आहे. यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष सुरू आहे. दरम्यान, शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार सुवर्णा खताळ सध्या पिछाडीवर आहेत. नगरसेवक निवडणुकीत संगमनेर सेवा समितीचे एकूण २८ नगरसेवक विजयी झाले असून, महायुतीचे खाते उघडले गेले आहे. महायुतीकडून १ नगरसेवक विजयी झाला असून, एका अपक्ष उमेदवाराला यश मिळाले आहे.
सांगली जिल्ह्यातील ६ नगरपरिषद आणि २ नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांत विविध पक्षांचे वर्चस्व दिसून आले आहे.
सध्याची स्थिती पुढीलप्रमाणे :
ईश्वरपूर नगरपरिषद: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आनंदराव मलगुंडे विजयी.
आष्टा नगरपरिषद: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विशाल शिंदे यांनी विजय मिळवला.
तासगाव नगरपरिषद: स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया सावंत विजयी ठरल्या.
पलूस नगरपरिषद: काँग्रेसच्या संजीवनी पूदाले विजयी झाल्या.
विटा नगरपरिषद: शिवसेना शिंदे गटाच्या काजल म्हेत्रे विजयी.
जत नगरपरिषद: भाजपचे रवींद्र आरळी यांनी बाजी मारली.
नगरपंचायतींचे निकाल:
आटपाडी नगरपंचायत: भाजपचे उत्तम जाधव विजयी.
शिराळा नगरपंचायत: शिवसेना शिंदे गटाचे पृथ्वीसिंग नाईक विजयी.
एकूणच सांगली जिल्ह्यात विविध पक्षांनी आपापले बळ दाखवत सत्ता वाटून घेतल्याचे चित्र आहे.
निवडणुकीच्या निकालात त्र्यंबकेश्वर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या पदरी निराशा आली असून शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत.
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे पिटू गंगणे १७७० मतांनी विजयी झाले आहेत. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असले तरीही जनतेने त्यांना आपला विश्वास दाखवत विजयी कौल दिला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघात भाजपचा दबदबा कायम राहिला असून, तुळजापुरात भाजपकडून पिटू गंगणे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अमर मगर यांच्यात जोरदार लढत रंगली होती. दोन दिवसांपूर्वीच दोन्ही गटांमध्ये राडा झाला होता. तसेच निवडणूक प्रचारात विरोधकांनी ड्रग्ज प्रकरणाचा जोरदार प्रचार केला, तरीही पिटू गंगणे विजयी ठरले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील शिवसेना शिंदे गटाच्या संजना पाटील विजयी झाल्या आहेत.
सध्या निवडणुकांचा निकाल जाहीर होत असताना पेणमध्ये भाजपचे एकूण ११ उमेदवार विजयी ठरले आहेत. त्यामुळे भाजप समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला उशीर झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भाजपच्या तेजश्री करुंजले या आघाडीवर आहेत.
मतदानाच्या दिवशी अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात पहाटे एका सभागृहात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष एकत्र जमल्याचे निदर्शनास आले होते. हे सर्व मतदार बोगस मतदानासाठी आणले गेले असल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर अंबरनाथ शहरात तणावाचे वातावरण दिसून आले होते.
बदलापूर-कुळगावात भाजपच्या रुचिता घोरपडे आघाडीवर आहेत.
सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपने सत्ता मिळवत आपला झेंडा फडकावला आहे. राजघराण्यातील श्रद्धा सावंत- भोसले या नगराध्यक्ष पदावर विजयी ठरल्या आहेत. या निकालामुळे सावंतवाडीतील शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने सत्ता स्थापन करत मोठा विजय साजरा केला आहे. नगराध्यक्ष पदाच्या लढतीत भाजपच्या श्रद्धा सावंत- भोसले यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नीता कविटकर यांचा पराभव केला असून, भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष सुरू आहे.
गेवराई नगरपरिषद निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालामुळे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी तब्बल पंधरा वर्षांची सत्ता कायम राखली असून, भाजपच्या गीता त्रिंबक बाळराजे पवार यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या निकालांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, पवार कुटुंबाच्या माध्यमातून मंत्री पंकजा मुंडे यांनी गेवराईत भाजपचे वर्चस्व कायम ठेवले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे. रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या नगरपरिषदांवर शिवसेना शिंदे गटाने आपला झेंडा फडकावला आहे. देवरूख आणि गुहागर नगरपंचायतींवर भाजपने विजय मिळवला असून, राजापूर नगरपरिषदेत काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिपे विजयी ठरल्या आहेत. तसेच लांजा नगरपंचायतीवरही शिवसेनेने बाजी मारली आहे.
एकूणच या निकालांमधून रत्नागिरीत शिवसेनेने आपला बालेकिल्ला कायम राखल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
फुलंब्री नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून आमदार अनुराधा चव्हाण आणि मंत्री अतुल सावे यांना राजकीय पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी ठरले आहेत.
मुखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार विजयी ठरले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांनी पहिल्याच निवडणुकीत यश संपादन केले आहे.
वेंगुर्ल्यात एकूण ८ नगरसेवक पदांपैकी केवळ एकच जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली असून उर्वरित जागांवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. विशेष म्हणजे वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर असलेला उमेदवारही भाजपचाच आहे.
वेंगुर्ला नगरपरिषद : विजयी नगरसेवकांची यादी
लीना समीर म्हापणकर - शिवसेना (शिंदे गट)
रवींद्र रमाकांत शिरसाट - भाजप
गौरी माईनकर - भाजप
प्रीतम सावंत - भाजप
विनायक गवंडकर - भाजप
गौरी मराठे - भाजप
आकांक्षा परब - भाजप
तातोबा पालयेकर - भाजप
एकूण निकाल पाहता वेंगुर्ल्यात भाजपची स्पष्ट आघाडी दिसून येत आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार नगरपरिषदेत भाजपने आघाडी घेतली आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजपाचे ३ उमेदवार विजयी झाले असून, शिवसेना शिंदे गटाचा १ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा १ उमेदवार विजयी ठरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी विजयाकडे आघाडी घेतली आहे. तसेच या गटाचे एकूण १७ उमेदवार विजयी होत आघाडीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, जेजुरी नगरपरिषदेत भाजप गटाचे दोन उमेदवार विजयी झाले असून, तानाजी खोमणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला आहे.
नाशिक जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सध्या खालील ठिकाणी आघाडी आणि निकालाची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.
भगूर: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे विजयी ठरल्या आहेत.
ओझर: भाजपच्या अनिता घेगडमल आघाडीवर आहेत.
पिंपळगाव बसवंत: भाजपचे डॉ. मनोज बर्डे आघाडीवर आहेत.
इगतपुरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे आघाडीवर आहेत.
सिन्नर: अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे विठ्ठलराजे उगले यांनी आघाडी घेतली आहे.
त्र्यंबकेश्वर: भाजपचे कैलास घुले आघाडीवर आहेत.
मतमोजणी सुरू असून पुढील घडामोडींसाठी लाईव्ह अपडेट्स येत आहेत.
बहुचर्चित कणकवली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार पिछाडीवर असून शिवसेनेचे संदेश पारकर यांनी आघाडी घेतली आहे. मालवणमध्येही भाजप उमेदवाराला मागे टाकत शिवसेनेचा उमेदवार पुढे आहे. तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आघाडीवर असून, या दोन्ही ठिकाणी निलेश राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्याच्या निकालांनुसार दोन्ही नगरपरिषदांमध्ये त्यांच्या पक्षाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. गडचिरोली नगरपरिषदेची मतमोजणी कृषी महाविद्यालयात, देसाईगंज नगरपरिषदेची मतमोजणी नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहात, तर आरमोरी नगरपरिषदेची मतमोजणी तालुकास्तरीय लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात पार पडणार आहे.
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रथम पोस्टल मतांची मोजणी केली जात आहे. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान पार पडले. तर दुसऱ्या टप्प्यातील २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह १५४ सदस्यपदांसाठी शनिवारी (२० डिसेंबर) मतदान पार पडले. या दोन्ही टप्प्यातील मतमोजणी आज (२१ डिसेंबर) होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल काय असणार आहे, त्याचे अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.