नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राला 'व्हॅलेंटाईन' दिनाची भेट देण्यात आली आहे. कसारा-मनमाड तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाइन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच घोटी-त्र्यंबक (मोखाडा)-जव्हार-मनोर-पालघर 'एनएच-१६०-ए'च्या पुनर्वसन आणि उन्नतीकरणाला आर्थिक व्यवहार कॅबिनेट समितीने मंजुरी दिली आहे. याचा भांडवली खर्च ३३२०.३८ कोटी रुपये इतका आहे.
कसारा-मनमाड तिसरा आणि चौथा लाइन प्रकल्प १३१ किमीचा असून त्याचा खर्च १० हजार १५४ कोटी रुपये इतका आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक रेल्वे प्रवासामध्ये मोठी सुधारणा होणार असून गर्दी कमी होऊन गाड्यांचा वेगही वाढणार आहे. कसारा-मनमाड प्रकल्पामुळे मुंबई-हावडा मार्गावरील कोंडी सुटणार असून गाड्यांचा वेग वाढणार आहे. त्यामुळे मनमाड-कसारा घाटातील रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या प्रकल्पाचे काम पुढील पाच वर्षांत म्हणजे २०३०-३१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
१ लाख कोटींचा शहरी सुविधा निधी
शहरी पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने शहरी सुविधा निधी सुरू करण्यास मान्यता दिली असून यासाठी केंद्र सरकारकडून एक लाख कोटी रुपयांचे अर्थसाह्य मिळणार आहे. केंद्राच्या अर्थसाह्यामधून २५ टक्के प्रकल्प खर्च तर किमान ५० टक्के निधी बाजारातून उपलब्ध केला जाणार आहे.