राज्यात काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर महाराष्ट्रातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण आणि घाट भागात पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टी आणि लगतच्या घाट परिसरात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी वेगाने वाहणारे वारे अनुभवायला मिळू शकतात. विशेषत: दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावरील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
'या' जिल्ह्यांना अलर्ट
सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याच्या घाट भागासाठी जोरदार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
२० जुलैच्या अंदाजानुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट भागात यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. तसेच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक भागांतील पावसाची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना स्थानिक प्रशासन तसेच हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.