महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाचा जोर! 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून यलो-ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून IMD ने सातारा, पुणे घाट परिसरासह अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जाणून घ्या आज आणि पुढील 24 तासांचा पावसाचा अंदाज.

Mayuri Gawade

राज्यात काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर महाराष्ट्रातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण आणि घाट भागात पावसाचा जोर वाढणार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टी आणि लगतच्या घाट परिसरात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी वेगाने वाहणारे वारे अनुभवायला मिळू शकतात. विशेषत: दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावरील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

'या' जिल्ह्यांना अलर्ट

सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याच्या घाट भागासाठी जोरदार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२० जुलैच्या अंदाजानुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट भागात यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. तसेच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक भागांतील पावसाची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना स्थानिक प्रशासन तसेच हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

UPI Payment साठी इंटरनेटची गरज नाही! २००० रुपयांपर्यंत ऑफलाइन व्यवहाराची सुविधा, जाणून घ्या...

महाराष्ट्रासाठी डेल्टा कायदा प्रस्तावित; कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समिती गठित करण्याचे फडणवीसांचे निर्देश

Mumbai : धरणांच्या नदीपात्रात गढूळ पाणी; पाणी गाळून, उकळून पिण्याचे पालिकेचे आवाहन

Mumbai : लोकलमध्ये पैशांसाठी प्रवाशाला मारहाण; व्हायरल VIDEO नंतर दोन ट्रान्सजेंडर पोलिसांच्या ताब्यात