पुणे : राज्यातील बहुतांश भागात गुरुवारी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाची रखरख कमी होऊन, वातावरणात गारवा पसरला आहे. दरम्यान, राज्यात शनिवार, ९ मेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अनेक भागांत सध्या पाऊस होत आहे. गुरुवारी पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, लातूरच्या काही भागांत पाऊस पडला, तर विदर्भाच्या काही भागात पावसाची तीव्रता अधिक होती. दुपारनंतर वातावरणात बदल होऊन, ढगाळ वातावरण झाले. त्यामुळे उन्हाचा कडाका कमी झाला. त्यानंतर वादळी हवा, विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने गारवा पसरला.
दरम्यान, राज्यात शनिवार ९ मे पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात शुक्रवारी धाराशिव, लातूर, सांगली, सातारा, कोल्हापूर सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोलीमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे, तर ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, रायगड येथे उष्ण व दमट हवामान राहणार आहे.
शनिवारी पावसाचा मारा किंचित कमी होणार होईल तर विदर्भाच्या बहुतांश भागात पाऊस राहणार असून मुंबई, ठाणे,पालघर येथे उष्णतेची लाट कायम असेल. दरम्यान, राज्यातील पाऊस ओसरणार असून, कमालतापमानात हळूहळू वाढ होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.