मुंबईः राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शिशुवर्ग ते आठवी, नववी ते दहावी तसेच अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत ४०० ते ८०० रुपयांनी वाढ होणार आहे.
निर्णयानुसार दिव्यांगत्वाच्या सर्व २१ प्रकारातील राज्यातील शिशुवर्ग ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये, नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ८०० रूपये (निवासी), ६०० रूपये (अनिवासी), अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रूपये (निवासी), ८०० रूपये (अनिवासी) शिष्यवृत्ती देण्यात येईल.
यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा १०० ते २०० रूपयांच्या दरम्यान होती. याशिवाय अकरावी आणि बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क तसेच अंध विद्यार्थ्यांसाठी दरमहा १५० रूपये वाचक भत्ता आणि दरवर्षी प्रत्यक्ष खर्चाच्या मर्यादेत १ हजार ५०० रूपये अभ्यास दौऱ्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल. बैठकीत या योजनेसाठी अपेक्षित २३ कोटी ११ लाख रूपयांच्या आवर्ती तरतुदीस मान्यता देण्यात आली.