मुंबई : राज्य परिवहन प्राधिकरणाने विशिष्ट कालावधीत एसटी महामंडळाला भाडेवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने उन्हाळी गर्दीच्या हंगामामध्ये साध्या बससेवा प्रकारातील बसेसच्या प्रवासभाडे दरात परिवर्तनशील भाडे आकारणीस मंजुरी दिलेली आहे. यामुळे साध्या बसेसच्या तिकीटमध्ये प्रति टप्पा १२ रुपये वाढ होणार असल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ही दरवाढ १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत लागू राहणार आहे.
यात्रा, सणासुदीचा काळ, सुट्ट्या, सप्ताह अखेर, अधिकतम गर्दी किंवा घाईगर्दीचा कालावधी या दरम्यान राज्य परिवहन प्राधिकरणाने तीस टक्के पर्यंत भाडेवाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी सन २०२६ उन्हाळी गर्दीच्या हंगामामध्ये साध्या बससेवा प्रकारातील बसेसच्या प्रवासभाडे दरास मंजुरी दिलेली आहे. उन्हाळी गर्दीचा हंगाम कालावधी १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत साध्या बससेवा प्रकाराकरिता लागू राहणार आहे.
साधा बस सेवा प्रकार वगळता निमआराम, विनावातानुकूलित शयनआसनी, विनावातानुकूलित शयनयान, शिवशाही (वातानुकूलित), जनशिवनेरी (वातानुकूलित), शिवनेरी (वातानुकूलित), ९ मीटर ई-बस (वातानुकूलित), १२ मीटर ई-बस/ई-शिवाई, या बससेवा प्रकारातील बस भाड्यात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. भाडे दरवाढीचे परिपत्रक एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी जारी केले आहे.
महामंडळाने हंगामी भाडेदर ११.५ रुपये मंजूर केला आहे. मात्र अंतिम आकारणी १ रुपयाच्या पटीत करण्यात येणार असल्याने प्रौढांसाठी १२ रुपये आणि मुलांसाठी ७ रुपये भाडे प्रथम टप्प्यास आकारण्यात येणार आहे.