मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फुटी प्रकरणाच्या तपासाला भिवंडी पोलिसांकडून मोठी गती मिळाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना भिवंडी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. सुतार यांच्या सुट्टी कालीन न्यायालयात रविवारी हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
टीईटी पेपर फुटी प्रकरणात पकडण्यात आलेले धीरज बलराज सिंग (वय २८, रा. हरयाणा), राजीव साव (वय ४५, रा. बिहार) आणि आकाशकुमार स्वराजकुमार (वय ३०, रा. बिहार) या तीन आरोपींना भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
हा पेपर नेमका कुठून आणि कसा लीक झाला, महाराष्ट्रात तो आणखी कुठे कुठे विकला गेला आहे का, यातील आर्थिक व्यवहार कशा प्रकारे व कोणासोबत झाले आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे लागेबांधे आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन न्यायालयाने पोलिसांची बाजू ऐकून घेतली व आरोपींना ८ दिवसांची म्हणजेच ६ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी मंजूर केली.
शिक्षणमंत्री भुसेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन
राज्यातील ‘टीइटी’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मंत्रालयासमोर तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. प्रंचड पोलिस बंदोबस्त असतानाही गनिमी काव्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर पोहोचून झीनत शबरीन यांनी बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवर ‘दादा भुसे राजीनामा द्या’ असे पोस्टर फडकावले व भुसे राजीनाम्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी “पेपरचोर गद्दीछोड”, “दादा भुसे राजीनामा द्या”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.