अकोला : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली असून राज्याच्या प्रत्येक विभागात सूर्य आग ओकत आहे. अकोल्याचे तापमान ४४ अंश सेल्सिअस वर गेले त्यामध्ये उष्मागाताचा पहिला बळी गेला आहे.
दरम्यान, १८ एप्रिलपासून पुढे ३ ते ४ दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीचा तसेच जखमा नाहीत. कदाचित या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे
विदर्भातील बहुतांश ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूरमध्ये ४३.२ अंशआणि जळगावमध्ये ४२.५ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. कोकण किनारपट्टीवर तापमान जरी ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान असले, तरी तिथे दमट हवामानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. हवामान विभागाने १६ एप्रिल रोजी अकोला, सोलापूर, सांगली यांसह कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे .
पावसाचा अंदाज
१८ तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, रत्नागिरी, अहिल्यानगर, परभणी, नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या घाट परिसराचा समावेश असून या ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस हजेरी लावेल.