पुणे : पोषक स्थितीअभावी मान्सूनच्या वाटचालीला किंचित ब्रेक लागला असून, राज्याच्या काही भागांत पुढील चार दिवस तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, येत्या ४-५ दिवसांत मान्सून महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातून येणारे बाष्प तसेच राज्यावर असलेल्या द्रोणीय स्थितीमुळे गेले काही दिवस राज्यात मान्सूनचा दमदार पाऊस झाला. १३ जूनपर्यंत राज्याचा ९० टक्के भाग मान्सूनने व्यापला, परंतु आता बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जळगाव, अमरावती, चंद्रपूर अशी मान्सून रेषा आहे. येत्या ४-५ दिवसांत मान्सून पुढे सरकण्याचा अंदाज आहे. सर्वसाधारणपणे १५ जूनला मान्सून राज्य व्यापतो, मात्र पोषक हवामानाअभावी त्याला आता आणखी वेळ लागणार आहे.
राज्यात यलो अलर्ट
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व वादळी पावसाचा अंदाज आहे. काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज पाहून पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’
पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांत गेले काही दिवस उष्णतेची लाट असून, यात दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अतितीव्र उष्णतेने कहर केला आहे. पुढील तीन दिवस या भागात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. गुरुवारी बिहारमधील बक्सर येथे सर्वाधिक ४७.२ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. इतर राज्यात उष्णतेचा ऑरेंज व यलो अलर्ट देण्यात आला आहे.