पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून आता उन्हाची तीव्रता वाढण्याचे संकेत भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी दिले आहेत. येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रातील कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत पुढील दोन दिवसांत किमान तापमानात १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल. तसेच विदर्भात पुढील ४८ तासांत कमाल तापमानात सुमारे २ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा अधिक जाणवणार आहे. मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत २५ व २६ मार्च रोजी उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे या भागातील नागरिकांना घाम व अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
तापमान वाढीबरोबरच राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २५ व २६ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा आणि घाट परिसरासह सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, नांदेड, लातूर व धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात २६ मार्चपासून पुढील ४ ते ५ दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.