महाराष्ट्र

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील बहुचर्चित निकाल तब्बल १७ वर्षांनंतर जाहीर झाला असून, सर्व सातही आरोपींना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं. दरम्यान, निर्दोष सुटकेनंतर भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कोर्टात अश्रूंना वाट मोकळी करत भावनिक प्रतिक्रिया दिली.

नेहा जाधव - तांबे

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील बहुचर्चित निकाल तब्बल १७ वर्षांनंतर जाहीर झाला असून, सर्व सातही आरोपींना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं. दरम्यान, निर्दोष सुटकेनंतर भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कोर्टात अश्रूंना वाट मोकळी करत भावनिक प्रतिक्रिया दिली. ''भगवा आणि हिंदुत्व जिंकले आहे. तसेच, आता खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होईल'' असे त्या म्हणाल्या.

साध्वी प्रज्ञा यांना अश्रू अनावर

वृत्तसंस्था एएनआयनुसार, निकाल लागल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, ''भगवा आणि हिंदुत्वाला बदनाम करण्याचा कट रचला गेला होता, पण आज सत्याचा विजय झाला आहे. भगव्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला. ज्यांनी भगव्यासह भारतालाही बदनाम केलं, ते आज चुकीचे सिद्ध झाले आहेत. यासाठी मी न्यायालयाचे आणि विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांचे मनापासून आभार मानते.” यावेळी भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं, मी संन्यासी म्हणून जिवंत

"मी सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की, ज्यांना चौकशीसाठी बोलावलं जातं, त्यांच्यामागे काही आधार असला पाहिजे. त्यांनी मला चौकशीसाठी बोलावलं, अटक केली आणि छळ केला. यामुळे माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी एका ऋषीसारखं जीवन जगत होते, पण मला आरोपी बनवण्यात आलं. कोणीही स्वेच्छेने आमच्या बाजूने उभे राहिले नाही," असे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी सांगितले. पुढे बोलताना, "मी जिवंत आहे, कारण मी एक संन्यासी आहे. मी दररोज मरत माझं जीवन जगत आहे," असेही त्या म्हणाल्या.

मी नाही, भगवा जिंकला -

प्रज्ञा ठाकूर पुढे म्हणाल्या, “भगव्या रंगाला आतंकवादाशी जोडण्यात आलं. पण, आज न्यायालयाने दाखवून दिलं की भगवा दोषी नाही. जे खरे गुन्हेगार आहेत, त्यांना देव शिक्षा देईल. आज मी जिंकले नाहीये, भगवा जिंकला आहे. ज्यांनी भगवा दहशतवादी म्हटलं आहे, त्यांना देव कधीही माफ करणार नाही."

साध्वी प्रज्ञावर काय आरोप होता?

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर १०१ हून अधिक जखमी झाले होते. या स्फोटासाठी वापरलेली मोटारसायकल साध्वी प्रज्ञा यांच्याच नावावर असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला होता. परंतु, ती मोटारसायकल प्रज्ञा ठाकूर यांच्या मालकीची होती असा कोणताही विश्वासार्ह पुरावा मिळाला नाही, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आणि पुराव्याअभावी त्यांना निर्दोष मुक्त केले.

मुंबईकरांचे झोपेचे गणित बिघडले, मिळत नाही आठ तासांचीही झोप; शहरी जीवनशैलीचा दुष्परिणाम

CBSE चा मोठा निर्णय; मध्यपूर्वेत ७ देशांतील बारावीच्या परीक्षा रद्द, निकालाबाबत लवकरच होणार घोषणा

Air Indiaच्या ट्रॅव्हल पॉलिसीचा गैरवापर; ४ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना दंड

दहावी-बारावी परीक्षेत 'मास कॉपी'चे प्राबल्य; १०३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे; निलंबनाची कारवाई

ठाणे जिल्ह्यात HPV लसीकरण मोहिमेला वेग; १४-१५ वर्षांच्या मुलींना मोफत लस; पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन