(Photo-@pinterest)
महाराष्ट्र

Marathi Bhasha Din : २७ फेब्रुवारीलाच का साजरा करतात मराठी भाषा दिन? जाणून घ्या कारण

मराठी भाषा दिनानिमित्त शाळा-महाविद्यालयांत विविध उपक्रम राबवले जातात. वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन, निबंध लेखन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीला मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला जातो.

किशोरी घायवट-उबाळे

दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसामागे एक महत्त्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. ज्येष्ठ कवी व साहित्यिक विष्णु वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती २७ फेब्रुवारीला असल्यामुळे हाच दिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून निवडण्यात आला. त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

१९९९ साली कुसुमाग्रज यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मराठी भाषा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. मराठी साहित्यविश्वात त्यांनी दिलेल्या भरीव योगदानामुळे ते महाराष्ट्राचे लाडके कवी, साहित्यिक, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून ओळखले जातात. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेल्या कुसुमाग्रजांनी कविता, कादंबऱ्या, निबंध, लघुकथा आणि नाटके अशा विविध साहित्यप्रकारांत प्रभावी लेखन केले.

त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृतींपैकी 'नटसम्राट' हे नाटक आजही रंगभूमीवर लोकप्रिय आहे, तर १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणारा 'विशाखा' हा कवितासंग्रह मराठी साहित्यातील मैलाचा दगड मानला जातो. सामाजिक जाणिवा, मानवतावादी दृष्टिकोन आणि भाषेची ताकद त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने जाणवते.

मराठी भाषा दिनानिमित्त शाळा-महाविद्यालयांत विविध उपक्रम राबवले जातात. वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन, निबंध लेखन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीला मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला जातो. डिजिटल युगातही मराठीचा वापर वाढावा आणि तिचा वारसा पुढे जावा, हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे.

आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; मुंबईत कधी बरसणार?

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; जुळ्या बोगद्यांसाठी TBM यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात

'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ

Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू

पुणे विषारी दारू प्रकरणात नवी मुंबईतील बाप-लेक अटकेत; घातक रसायने पुरविल्याचे उघड, आतापर्यंत ३३३ जणांवर कारवाई