रिक्षा, टॅक्सीचालकांना १ मेपासून मराठी बंधनकारक; मराठी भाषा येत नसल्यास परवाने रद्द; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती 
महाराष्ट्र

रिक्षा, टॅक्सीचालकांना १ मेपासून मराठी बंधनकारक; मराठी भाषा येत नसल्यास परवाने रद्द; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

१ मेपासून महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे. परिवहन विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबवून चालकांना मराठी वाचता-लिहिता येते का याची पडताळणी केली जाईल. मराठी न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द केले जातील, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मे पासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दिली.

मोटार परिवहन विभागामार्फत रिक्षा किंवा टॅक्सीचालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे, म्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान असणे, हा नियम आधीपासूनच लागू आहे. मात्र, मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही. तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले.

ज्या प्रदेशात आपण राहतो, त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असेही ते म्हणाले.

...तर परिवहन अधिकाऱ्यांवरही कारवाई

या पार्श्वभूमीवर १ मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे बंधनकारक राहील. नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील. तसेच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

कमी पाण्याची पिके घ्या; शेती खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन

आसाममधील चहाच्या मळ्याचा ‘टी टुरिझम’वर भर; ग्राहकांना चहाच्या संस्कृतीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न

‘गृह’ अन् ‘महसूल’ खाते कोणाकडे हे माहिती आहे का? परिवहन मंत्री सरनाईक यांचा आमदार मेहतांना टोला

मुंबईत गंभीर गुन्हेगारीत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ

Navi Mumbai : एनआरआय फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांची झुंबड; DPS, TSC वेटलँड्स पुनर्जीवित करा, पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी