सुजित ताजणे /छत्रपती संभाजीनगर
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणानंतर शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर आरसीसी कोचिंग क्लासेसच्या शहरातील शाखांना टाळे लागले आहे. परिणामी या क्लासेसमध्ये शिकणारे हजारो विद्यार्थी हवालदिल झाले असून लाखो रुपये फी भरून आता पुढे काय करायचे? असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.
शहरासह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी ‘आरसीसी’ क्लासेसमध्ये शिकतात. या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. शहरातील क्लासेसला गेल्या दोन दिवसांपासून टाळे आहे. आपल्या मुलाला डॉक्टर, इंजिनिअर बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून पालकांनी या क्लासमध्ये दाखल केले. मात्र पेपरफुटीमुळे संचालकच अटकेत गेल्याने या क्लासेसचे भवितव्य टांगणीला लागले आहे. दरम्यान, मोटेगावकरला अटक केल्यानंतर आरसीसीच्या संभाजीनगरच्या शाखेतील क्लास बंद केल्याची चर्चा होती. मात्र, २ जूनपर्यंत आधीच सुट्ट्या दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, आज मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर क्लास बंद पडल्याच्या अफवा पसरल्या आहेत. पण, प्रत्यक्षात माहिती घेतली असता अगोदरच सुट्ट्या जाहीर झाल्याचे सांगितले.
लातूरमधील विद्यार्थ्यांना मानसिक फटका
लातूर : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सर्वाधिक मानसिक आणि शैक्षणिक फटका लातूरच्या आरसीसी कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांना आणि पालकांना बसला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेत आणि लाखो रुपये खर्च करून या संस्थेत प्रवेश घेतला होता. आता मात्र पुढील दीड महिन्यांच्या तयारीसाठी कुठे जावे, कोणत्या शिक्षकांवर विश्वास ठेवावा आणि अभ्यासाची दिशा कशी ठरवावी, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे.
लातूरसह राज्यातील अनेक खासगी कोचिंग क्लासेसनी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुढील दीड महिन्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नसल्याची भूमिका काही संस्थांनी घेतली आहे. तसेच मोफत टेस्ट सीरिज, डाऊट सोल्विंग सेशन्स आणि क्रॅश कोर्स सुरू करण्याची तयारीही करण्यात आली आहे. आरसीसी पुन्हा सुरू होईल का, त्यांचे शिक्षक विद्यार्थ्यांना उपलब्ध राहतील का आणि व्यवस्थापनावर पुढे आणखी कोणती कारवाई होईल का, याबाबत कोणतीही अधिकृत स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.