मुंबई : पुढील महिन्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) गणेशभक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातून मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन यंदा ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत ५ हजार २२० जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिली.
महामार्गांवर पथक तैनात करणार
या जादा बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांना बसस्थानकांवर तसेच MSRTC Bus Reservation या अधिकृत मोबाईल ॲपद्वारेही आरक्षण करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांमधून जादा बसेसचे संचालन करण्यात येणार असून, सर्व प्रमुख बसस्थानके आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी २४ तास कार्यरत राहतील. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर आवश्यक ठिकाणी वाहन दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत.
१० ऑगस्टपासून गट आरक्षण
गणेशोत्सवानिमित्त १० ऑगस्टपासून किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी विशेष गट आरक्षण सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के भाडे सवलत तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत मिळणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.