मुंबई : अनेक उपाययोजना करूनही मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात होतच आहेत. शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अनेक वाहने एकमेकांवर धडकली. यात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती.
पुणे-मुंबई मार्गिकेवर खोपोली हद्दीत तीव्र उतारावर अनेक वाहने एकमेकांना धडकली. ज्यात तीन कार तीन बसेस आणि एका ट्रकचा समावेश होता. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर जण गंभीर जखमी झाले. अश्विनी हळदणकर आणि श्रेया अवताडे अशी मृतांची नावे आहेत, तर वसुधा जाधव, रसिका अवताडे, सारिका जाधव, अविनाश जाधव, आणि अक्षय हळदणकर अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. या सर्वांवर खोपोली आणि कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा, देवदूत यंत्रणा, खोपोली पोलीस आणि हेल्प फाऊंडेशनची पथकाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. अपघातामागचे कारण समजू शकले नाही.