(संग्रहित छायाचित्र) 
महाराष्ट्र

भाजपचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’; नाना पटोले यांची टीका

Swapnil S

मुंबई : सत्तेत असताना १० वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपने नोकरीच्या नावाने देशातील तरुणांना फसवले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्यांना फसवले. जीएसटीच्या माध्यमातून छोटे व्यापारी आणि जनतेला फसवून अदानीचे खिसे भरले. आता पुन्हा याच घटकांना फसवण्याचा प्रयत्न भाजपचा प्रयत्न असून त्यांचा निवडणूक जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ आहे. जनता आता भाजपच्या या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा घोषित केला. या जाहिरनाम्यातील आश्वासनांचा पटोले यांनी समाचार घेतला. मोदी सरकारने मागील १० वर्ष फक्त अदानीसाठी काम केले. हे सरकारच अदानी सरकार होते. पण जाहिरनाम्यात अदानीचा हिस्सा असायला हवा होता ते मात्र दिसत नाही, असा टोला पटोले यांनी लगावला.

समान नागरी कायद्याचे आश्वासन तर मागील निवडणुकीतही दिले होते. मग आतापर्यंत भाजपने त्याची अंमलबजावणी का केली नाही? त्यांना कोणी रोखले होते का? वन नेशन, वन इलेक्शन म्हणजे पुन्हा निवडणुकाच घेणार नाही असे आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने जे सांगितले तेच मुद्दे आजच्या जाहीरनाम्यात आहेत. जनता आता भाजपच्या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला घरी बसवण्याचा संकल्प जनतेने केला आहे, असे पटोले म्हणाले.

दरम्यान, भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि कायमचे भावी पंतप्रधान नितीन गडकरी यांनी चंद्रपूरातील सभेत खालची पातळी गाठली. आमचा उमेदवार शिलाजित खाल्लेला पैलवान आहे, असे विधान करून गडकरींनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. शिलाजित कशासाठी खातात हे नितीन गडकरींनी सांगावे. महिलांचा अपमान करणाऱ्या नितीन गडकरी यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी यावेळी केली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस