लासलगाव : नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात वाढलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवनासह जनावरांनाही मोठा फटका बसत आहे. निफाड तालुक्यात यंदा तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा सातत्याने ओलांडला असून, सोमवारी ते तब्बल ४३ अंशांपर्यंत पोहोचले. बुधवारीही तापमान ४१ अंश सेल्सिअसवर कायम राहिल्याने दुग्ध व्यवसायावर परिणाम होत असल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर लासलगाव येथील शेतकरी प्रमोद पाटील आणि महेंद्र पाटील यांच्या गोठ्यातील गाई उष्णतेमुळे अस्वस्थ होत होत्या. वाढत्या तापमानामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊन दुध उत्पादनात घट झाली होती. गोठ्यातील उष्णता कमी करण्यासाठी त्यांनी अनोखा उपाय अवलंबला.
प्रमोद पाटील यांनी सुमारे सात हजार रुपये खर्च करून गोठ्यात १६ फॉगर (स्प्रे) बसवले. या फॉगरद्वारे सूक्ष्म पाण्याची फवारणी होत असल्याने गोठ्यातील तापमान नियंत्रित राहू लागले. परिणामी गोठ्यात गारवा निर्माण होऊन गाईंच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. फॉगर प्रणाली सुरू झाल्यानंतर गाईंचा ताण कमी झाला, आहारात सुधारणा झाली आणि दुध उत्पादनातही वाढ झाल्याचे महेंद्र पाटील यांनी नमूद केले. बदलत्या हवामानाशी जुळवून घेत दुग्ध व्यवसाय टिकवण्यासाठी हा कमी खर्चातील उपाय प्रभावी ठरत असून, परिसरातील इतर पशुपालकांसाठीही हा प्रयोग मार्गदर्शक ठरत आहे.