मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने गुरुवारी जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. पालघर जिल्ह्यात पावसाने रौद्ररूप धारण केले असून डहाणू तालुक्यात २४ तासांत तब्बल १५ इंच पावसाची नोंद झाली. धामणी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सूर्या नदीला पूर आला आहे. मासवणसह अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. रस्ते, पूल आणि रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून ८९१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
ठाणे शहरात २४ तासांत ९९.३२ मिमी पाऊस झाला.मुसळधार पावसामुळे झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे ६० तक्रारी दाखल झाल्या. महावितरणच्या यंत्रणांवरही परिणाम झाला असून बदलापूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असून शहरात २४ तासांत १०० मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरण ९० टक्के तर दारणा धरण ८५ टक्के भरले आहे. धरणांतून नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरी व दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.