गोंदिया : युतीचा विचार डोक्यातून काढून टाकला पाहिजे, युतीचे जमले तर केले पाहिजे, नाही जमले तर सोडून दिले पाहिजे. हे असे आमचे धोरण ठरले आहे. कारण सगळीकडे युती होऊ शकत नाही, असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या मेळाव्यात प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होण्याचे आदेश दिले असून, त्यांना खास कानमंत्रही दिला आहे.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, प्रभागामध्ये आपल्याकडे उमेदवार असेल. युतीतील सर्व घटक पक्षांकडे उमेदवार असतील तरी आपल्या पक्षातल्या उमेदवाराला संधी न देणे, दुखावणे हे मला योग्य वाटत नाही, म्हणून जिथे सोयीचे वाटेल तिथे युती बघू. नगराध्यक्षाच्या एखाद्या निवडणुकीमध्ये सगळ्यांच्या मतदानाची आवश्यकता पडते. त्यामुळे एखाद्यावेळी विचार करू, त्यामध्येही खात्री मी देत नाही.