मुंबई/पुणे : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील माजी महापौर प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असताना प्रशांत जगताप यांनी थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पुण्यात काँग्रेसला बळ मिळाले असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.
पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यानीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रशांत जगताप यांना अनेक पक्षांचे आमंत्रण असतानाही त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे पसंद केले. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश हा काँग्रेसला बळ देणारा आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. यावेळी जगताप व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात त्यांनी स्वागत केले.
काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, आमदार हेमंत ओगले, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे सरचिटणीस भाऊसाहबे आजबे, धनंजय शिंदे, आदी उपस्थित होते.
प्रशांत जगताप हे पुण्यातील एक प्रभावशाली स्थानिक नेते आहेत. त्यांनी यापूर्वी पुण्याचे महापौर म्हणून कार्यभार सांभाळला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांचा पराभव झाला होता.
जगताप यांच्या प्रवेशादरम्यान काँग्रेसने आगामी निवडणुकीबाबत आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी संकेत दिले आहेत की, काँग्रेस पुणे महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची शक्यता आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले की, कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत (शरद पवार गट) युती करण्यास फारसा उत्सुक नाही, परंतु शिवसेना (उबाठा) आणि इतर समविचारी पक्षांशी निवडणूक तडजोड करण्यास तयार आहे.
आंबेडकरांची विचारधारा व काँग्रेस पक्ष या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकीय पक्ष हे विचारधारेवर काम करत असतात आणि काँग्रेस पक्ष ही वैचारिक लढाई निष्ठेने व निकराने लढत आहे. पण आज काही पक्ष हे केवळ सत्ता व सत्तेतून भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवणे व त्या पैशातून निवडणुका जिंकणे हे काम करत आहेत. ‘पैसा फेक व तमाशा देख’ हे वगनाट्य जोरात सुरू आहे. काँग्रेसची विचारधारा देशाला तारणारी आहे आणि प्रशांत जगताप यांनी काँग्रेसच्या प्रशांत महासागरात प्रवेश केल्याचे सपकाळ म्हणाले.
काँग्रेस पक्षाला विचारांचा वारसा आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्यांसाठी काँग्रेसचा लढा सुरू आहे, तर दुसरीकडे भाजप हा जातीवादी, मनुवादी विचाराचा पक्ष आहे. भाजपची भूमिका ही केवळ मूठभर लोकांच्या हाती राजसत्ता व धर्मसत्ता असावी अशी आहे. काही लोकांना काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार सर्व पदे दिली,पण त्यांची घुसमट होते म्हणून ते काँग्रेस पक्ष सोडून गेले. लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार) यांच्याबरोबर काम करत होते. प्रशांत जगताप यांनी जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली व काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विचारांशी बांधिलकी अशी असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांशी तोडजोड न करणारे ते नेते आहेत. त्यांना अनेकांनी ऑफर दिली, थांबावण्याचा प्रयत्न केला पण प्रशांत जगताप यांनी पुरोगामी शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सोडला नाही. असे नेते असतील तर २०२९ आपले असेल, असा विश्वास काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
देशासमोर लोकशाही, संविधान वाचवण्याची नितांत गरज आहे. शेतकरी, महिला, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत, पण कोणालाही न्याय मिळत नाही. या ज्वलंत प्रश्नावर काँग्रेस पक्ष लढा देत आहे. राज्यात व देशात जातीयवाद व भ्रष्टाचार वाढत चालला आहे. भाजपने खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली. ‘तोडा फोडा’ ही भाजपची नीती आहे, अशा वेळी देशाला केवळ काँग्रेसचे विचारच वाचवू शकतात, असे माजी मंत्री नसीम खान म्हणाले.
काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार
नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षचेने ४१ नगराध्यक्ष विजयी झाले. या विजयी नगराध्यक्षांचा शुक्रवारी टिळक भवनमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला.
नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे १,००६ नगरसेवक निवडून आले, तर १०० नगरपालिकांमध्ये काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी पैशांचा वारेमाप वापर केला, पोलिसांचा वापर केला. निवडणूक आयोग त्यांच्या मदतीला होता. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करण्यात आली, मारहाण करण्यात आली, खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तरीही काँग्रेसचा कार्यकर्ता न डगमगता लढला व यश मिळवले. आज राज्यात काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. ४१ ही संख्या फार मोठी नाही, पण आजच्या विपरीत परिस्थितीत जे यश मिळवले आहे ते उल्लेखनीय आहे. जे विजयी झाले त्यांचे अभिनंदन आहेच पण जे पराभूत झाले त्यांचेही अभिनंदन आहे, कारण त्यांनी निर्धाराने लढा दिला, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘काँग्रेस लढणार, महाराष्ट्र जिंकणार’ या टॅगलाईनचे व टिझरचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
भाजपला फक्त काँग्रेसच टक्कर देणारा पक्ष
काँग्रेस पक्ष १३५ वर्षांचा जुना पक्ष असून अथांग महासागर आहे. कितीही वादळे आली तरी काँग्रेस पक्ष हिमालयासारखा खंबीरपणे उभा आहे. पुरोगामी विचाराचा मी कार्यकर्ता असून शिवाजी, शाहू, फुले, आंबेडकर, गांधी व नेहरूंचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. माझी लढाई जातीयवादी पक्ष व भ्रष्टाचाराविरोधात आहे आणि भाजपला फक्त काँग्रेस पक्षच टक्कर देऊ शकतो, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.