

मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शक्य असेल तेथे खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा द्यावी, तर अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवस सुट्टी देण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
रेड अलर्टनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई महानगर प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट वाढवून रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ताशी ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहण्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर एसडीएमएने ही मार्गदर्शक सूचना जारी केली.
सखल भागात पाणी साचण्याचा इशारा
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे सखल भागांत पाणी साचणे, अचानक पूर येणे, नद्यांना पूर येणे तसेच रस्ते आणि पुलांवर पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच जोरदार वाऱ्यामुळे कमकुवत झाडे उन्मळून पडणे, जुन्या इमारतींचे नुकसान होणे आणि डोंगराळ भागांत दरड कोसळण्याचा धोका असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
खासगी कंपन्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आवाहन
एसडीएमएने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर जारी केलेल्या सूचनेत खासगी आस्थापनांनी शक्य तेथे कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'ची व्यवस्था करावी, असे म्हटले आहे. तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत कर्मचारी वगळता सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गिरीश महाजन यांचे विरोधकांना आवाहन
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीचे राजकारण करू नये, अशी विनंती त्यांनी विरोधकांना केली.
विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "आज नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. पर्यटनासाठीही जाऊ नका. कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल. कृपया घरातच सुरक्षित राहा."
ताशी ९० किमी वेगाने वाऱ्याचा इशारा
रविवारी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणारे वारे सोमवारी ७० ते ९० किमी वेगाने वाहण्याची शक्यता असल्याचे महाजन यांनी सांगितले. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून वाहनांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विनाकारण घराबाहेर पडू नये, अन्यथा पोलिसांना कठोर कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
धरणसाठ्यात वाढीसाठी आणखी काही दिवस पावसाची गरज
महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस चांगल्या पावसाची गरज असल्याचे महाजन यांनी सांगितले. राज्यातील जलसंकलन क्षेत्रात समाधानकारक पाऊस होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.