पुणे : पुण्याच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलीस तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपींनी केतनला ठार मारण्यापूर्वी त्याला आयुष्यभरासाठी अपंग बनवण्याचा कट रचला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा साथीदार चेतन चौधरी यांनी ६ जून रोजी होणारी बाली ट्रिप आणि त्यानंतर होणारे लग्न टाळण्यासाठी हा भयंकर कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
सुरुवातीला केतनचा खून करण्याची त्यांची योजना नव्हती, तर एका बनावट अपघाताच्या माध्यमातून किंवा लुटीचा बनाव रचून केतनचे हात किंवा पाय कायमचे निकामी करण्याचा त्यांचा विचार होता. केतनला अपंगत्व आले तर कुटुंबीयांना लग्न मोडण्यासाठी तयार करणे सोपे जाईल, असा सियाचा विश्वास होता. यासाठी त्यांनी भाडोत्री मारेकऱ्यांना सुपारी देऊन त्याला अपंग करण्याचाही विचार केला होता, मात्र त्यांनी कोणत्याही मारेकऱ्याशी थेट संपर्क साधला नाही.
या भयानक कटाच्या अंमलबजावणीसाठी आरोपींनी गुगलवर 'स्लो पॉयझनिंग'चा सुगावा लागतो का, याचेही सर्चिंग केले होते. या कटासाठी त्यांनी लोणावळ्या जवळील टायगर पॉइंट आणि विसापूर किल्ल्यासह अनेक ठिकाणांची रेकी केली होती, मात्र अखेर त्यांनी लोहगड किल्ल्याची निवड केली. केतनची हत्या करण्यापूर्वी सिया आणि केतनने लोहगडला भेट दिली होती. ३१ मे रोजी सियाने फक्त परिस्थितीची पाहणी केली, तर ४ जून रोजी तिने पुन्हा तिथे जाण्याची योजना आखली होती, परंतु कुटुंबीयांच्या विरोधामुळे ती जाऊ शकली नाही. त्यानंतर १४ जून रोजी ती पुन्हा केतनसोबत लोहगडवर गेली, मात्र त्या दिवशी प्लॅन अमलात न आल्याने तिने तिथे साप दिसल्याचा बहाणा करून तिथून काढता पाय घेतला होता. या प्रवासादरम्यान सियाने केतनचा पासपोर्ट चोरून तो पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील फूड मॉलमधील प्रसाधनगृहात फेकला होता.
१८ जून केली रिहर्सल
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, १८ जून रोजी प्रत्यक्ष हत्येपूर्वी सिया आणि चेतनने पुण्याच्या बेव्हरली हिल्स किंवा लुल्ला नगर परिसरातील कॅफेमध्ये भेटून एखाद्या व्यक्तीला टेकडीवरून खाली कसे ढकलून द्यायचे, याची चक्क रिहर्सल केली होती.१९ जून रोजी केतनने सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी महाबळेश्वरच्या ट्रिपचे नियोजन केले होते.