महाराष्ट्र

नांदेडहून निघालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी घातला धुमाकूळ; मनमाड ते नाशिक दरम्यान चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुबाडले

नांदेडहून निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मनमाड ते नाशिक दरम्यान अनेक प्रवाशांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लुबाडले. या घटनेत काही प्रवासी जखमीही झाले आहेत.

Swapnil S

नांदेड : नांदेडहून निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मनमाड ते नाशिक दरम्यान अनेक प्रवाशांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लुबाडले. या घटनेत काही प्रवासी जखमीही झाले आहेत. लुबाडल्यानंतर पळून गेलेल्या चोरट्यांना तात्काळ पकडावे, या मागण्यासाठी प्रवाशांनी काही काळ रोको आंदोलनही केले. या घटनेमुळे तब्बल दोन ते तीन तास राज्यराणी एक्सप्रेस खैरवाडी या स्थानकावर थांबवण्यात आली होती. त्यामुळे नांदेडहून मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांचे मात्र, प्रचंड बेहाल झाले.

नांदेडहून बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास निघालेली राज्यराणी एक्सप्रेस गुरुवारी सकाळी मनमाडहून नाशिककडे निघाली. त्यावेळी अचानक रेल्वेमध्ये प्रवाशांना धमकावणे आणि लुबाडण्याचा प्रकार सुरू झाला. प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुबाडण्यात येत होते. यावेळी काही प्रवाशांनी प्रतिबंध केला असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यात विशाल शंकर कांबळे यासह अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे काही प्रवाशांनी खैरवाडी येथे चैन ओढून रेल्वे थांबवली. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना धारेवर धरले. चोरट्यांना पकडण्याच्या मागणीसाठी रेल्वे रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. यामुळे अनेक गाड्या उशिराने धावल्या.

रेल्वेच्या सुरक्षेबाबत प्रवाशांचा संताप

दरम्यान, मुंबईमध्ये गुरुवारी होणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून अनेक प्रवासी राज्यराणी एक्सप्रेसने मुंबईकडे जात होते. त्याचवेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो प्रवासी मुंबईकडे निघाले आहेत. या प्रवाशांनी अपुऱ्या रेल्वे सुरक्षेबाबत संताप व्यक्त केला आहे. दोन ते अडीच तासानंतर राज्यराणी खैरवाडीहून मुंबईकडे रवाना झाली. सकाळी १० वाजता मुंबईत पोहोचण्याची वेळ असलेली राज्यराणी एक्स्प्रेस गुरुवारी दुपारी १.४० वाजता मुंबई येथे पोहोचली.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग