अमित श्रीवास्तव/मुंबई
महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्र लाट पसरली असून उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मार्च ते २० मे या अडीच महिन्यांच्या कालावधीत राज्यातील उष्माघाताच्या रुग्णांची एकूण संख्या २२६ वर पोहोचली आहे. विशेषतः मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात केवळ चार दिवसांत तब्बल १७१ जणांना उष्माघाताचा फटका बसल्याने राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. उन्हाच्या या तीव्र लाटेमुळे राज्यात ६ संशयित मृत्यूंची नोंद झाली असून अंतिम अहवालानंतर यावर शिक्कामोर्तब होईल.
लाटेचा सर्वाधिक फटका संभाजीनगरला बसला असून तेथे सर्वाधिक ४१ रुग्णांची नोंद झाली. नंदुरबारमध्ये २४, नाशिकमध्ये १९, बुलढाण्यात १७, अमरावतीत १६ तर वर्ध्यात १४ रुग्ण आढळले. मुंबईत तापमान वाढत असले तरी उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही.