मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मंगळवारी संभाव्य हिंसेबद्दल चिंता व्यक्त करत गुरुवारी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दिवशी दुबार आणि बोगस मतदारांना धडा शिकविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे एक संयुक्त पथक स्थापन केल्याची घोषणा त्यांनी केली.
मुंबई आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रचार करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या सार्वजनिक आवाहनानंतर राऊत यांनी ही धमकी दिली आहे.
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) यांनी मुंबईचा गड राखण्यासाठी युती केली आहे.
आम्ही (शिवसेना-ठाकरे गट आणि मनसे) एक पथक तयार केले आहे. ते (१५ जानेवारी रोजी) सकाळी ७ वाजल्यापासून कामाला लागेल. एकदा या पथकाला विभागानुसार दुबार मतदारांची माहिती मिळाल्यावर, ही संयुक्त टीम अशा मतदारांना योग्य प्रकारे हाताळेल, असे राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.
राऊत यांचा हा इशारा २९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आला आहे. यामध्ये मुंबई महानगर प्रदेशात एका बाजूला भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना (ठाकरे गट) - मनसे युती यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या आहेत.
विरोधकांनी राज्य निवडणूक आयोगासमोर बोगस आणि दुबार मतदारांचा मुद्दा जोरदारपणे मांडला होता आणि मतदार यादीतील कथित त्रुटी दूर करण्याची मागणी केली होती.
दुबार मतदार आढळल्यास त्यांना काही झाले तर आम्ही जबाबदार नसू. याबाबतच्या होणाऱ्या परिणामांची तयारीही सरकारने ठेवायला हवी. दुबार मतदारांना मारहाण करणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणे असे नाही. बोगस मतदान कायदा-सुव्यवस्थेच्या व्याख्येत बसते का?संजय राऊत, खासदार