कणकवली : सिंधुदुर्गात आंबा आणि काजू पिकाला नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी सोमवार २३ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता नांदगाव येथे मुंबई - गोवा महामार्ग रोखण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व आंबा-काजू बागायतदार व शेतकरी सहभागी होणार आहेत.
बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा - काजू फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून गेला महिनाभर शेतकरी आणि बागायतदार आक्रमक बनले असून शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत आहेत. दरम्यान आंब्याला हेक्टरी पाच लाख आणि काजूला हेक्टरी तीन लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची आणि बागायतदारांची मागणी आहे.
गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अचानकपणे मोर्चासमोर येऊन अधिवेशन काळात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. सरकारचा निर्णय होवा अथवा न होवो आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून २३ तारखेला ‘चक्का जाम’ आंदोलन होणारच असा निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला होता त्यानुसार सोमवारी सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन होणार आहे