सिंधुदुर्ग : बांदा व दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसांत माकडताप बाधित पाच रुग्ण आढळल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आता खडबडून जागी होत सतर्क झाली आहे. माकडताप प्रामुख्याने गोचीडानमुळे माकडांमधून मानवामध्ये पसरणारा फ्लॅव्ही वायरस गटातील विषाणूजन्य आजार आहे.
दरवर्षी उष्णतेचे प्रमाण वाढले आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली की, वन्यप्राणी विशेषता माकड पाण्यासाठी वणवण करत शहरांकडे मनुष्य वस्तीकडे धाव घेतात. साधारणपणे एप्रिल मे महिन्यात माकड तापाचा प्रादुर्भाव सुरू होतो.
या रोगाचा विषाणू गोचिडीमार्फत मुख्यतः माकडांच्या त्याचप्रमाणे इतर सस्तन प्राण्यांच्या शरिरात प्रवेश करतो. परंतु गोचिडीमुळे माणसाला या रोगाची बाधा झाल्याचे आढळलेले नाही. त्याचबरोबर, या रोगावर अजून तरी कोणताही निश्चित उपाय सापडलेला नाही. त्यामुळे भारत सरकारच्या “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी” या संस्थेने या माकड रोगाला ‘पब्लिक हेल्थ अलर्ट’म्हणून घोषित केले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील बांदा आणि आसपासच्या गावांमध्ये तसेच दोडामार्ग तालुक्यातील गोव्याच्या सीमेवरील अनेक गावांमध्ये माकड तापाचे रुग्ण आढळतात. काही वर्षे सातत्याने या परिसरात माकड ताप डोके वर काढत असतो. याही वर्षी या रोगाची लागण सुरू झाली आहे त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणाही आता कामाला लागली आहे.
सापडलेल्या रुग्णात बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आरोग्य कर्मचाऱ्याचा समावेश आहे. सर्व रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी सुरू आहे. याच कालावधीत काजू बागायतीत सहा माकडे मृतावस्थेत आढळल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर यांनी दिली.