मुंबई : “येत्या २९ ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी राहायचे नाही. मुंबईला जाऊन मला बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत. शेअर मार्केटचा बैल, विमान कसे उडते, आणि मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ निवासस्थानही पाहायचे आहे. ‘वर्षा’वर फडणवीसांनी ठेवलेल्या पाण्याच्या टाकीवर मी उपोषणाला बसणार आहे,” असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी येथे आयोजित सभेत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केले. “चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या तोंडातला घास हिसकावण्याचे काम केले आहे. आम्ही त्यांना चूक सुधारायला सांगितली होती. आम्हाला वाटले होते की, फडणवीस त्यांची चूक मान्य करतील, पण ते उलट पाठराखण करत आहेत. हे दोघेही मराठ्यांसोबत जातीयवाद करत आहेत,” असा आरोप जरांगेंनी केला.
२९ ऑगस्टला मुंबईत धडक
२९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाने मुंबईकडे कूच करण्याचे संकेत जरांगे यांनी दिले आहेत. “मराठे मुंबईला धडकतील आणि पुढचे उपोषण हे थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावरील पाण्याच्या टाकीवरच होईल,” असे जरांगे- पाटील म्हणाले.
मराठे खवळून उठलेत, आता उठाव करावाच लागेल
“केवळ मराठाच नव्हे, तर यांनी धनगर समाजाचे वाटोळे केले, शेतकऱ्यांची फजिती केली आणि बंजारा, आदिवासी समाजाच्या योजना खाऊन घेतल्या. आपण किती दिवस आंधळे होऊन हे सगळं बघणार आहोत? आता कष्ट करण्याची वेळ आली आहे, मराठ्यांना त्रास देणाऱ्यांचा माज उतरवण्यासाठी उठाव करावाच लागेल,” असे आवाहन जरांगे यांनी समाजाला केले.